पुणे : ‘कोणत्याही जिल्ह्यात नवीन उद्योगांची आखणी करण्यापूर्वी त्या जिल्ह्यातील उद्योगांसाठीचा ‘झोनिंग अॅटलास’ लक्षात घेणे आवश्यक ठरते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बहुतेक सर्व जिल्ह्यांसाठी हे अहवाल बनवले आहेत ;परंतु माझ्या माहितीनुसार हे अहवाल दडपले गेले असून, ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे’, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात ‘पीआयसी’च्या वतीने संस्थेच्या सातव्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. गाडगीळ बोलत होते. या वेळी डॉ. गाडगीळ यांनी ‘आजचे केरळ, उद्याचे कोकण?’ या विषयावर आपली मते मांडली.
पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अमिताव मलिक, मानद संचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने या वेळी www.climatecollectivepune.org या पर्यावरण विषयक वेबसाईटचे अनावरणही गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा विरोध डावलूनदेखील विविध प्रकल्प प्रस्तावित केले जात आहेत. हे योग्य नसून, उद्योगांसाठीच्या झोनिंग अॅटलासचे अहवाल नागरिकांसमोर खुले व्हावेत यासाठी दबाव आणायला हवा. अमेरिकन अर्थतज्ज्ञ लॅरी समर्स म्हणाले होते की, ज्या देशात गरिबी आहे त्या देशात विषारी प्रकल्प उभारावेत. याचा गर्भित अर्थ असा की त्या देशातील नागरिकांचे जीवन स्वस्त आहे. विषारी प्रकल्प देशात येत असून, ही काळजी करण्याजोगी बाब आहे.’
विकासाच्या नावाखाली आणले जाणारे प्रकल्प, या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढतील अशी दाखवली जाणारी स्वप्ने आणि अनेक उद्योगांचे विषारीस्वरूप याबाबत अनेक उदाहरणे देऊन ते म्हणाले, ‘ही परिस्थिती बदलण्यासाठी कायद्यांची योग्य अंमलबजावणी व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत काम करणे महत्त्वाचे आहे.’
‘केरळमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीनंतर पुर्नविकासाच्या कामात स्थानिक महिला बचत गटांची मदत सरकारला होऊ शकते. कुटुंबश्री हा महिला बचत गट केरळमध्ये सामान्य महिलांशी जोडलेला असून, त्यांच्या मदतीने हे शक्य आहे. अर्थात यासाठी योग्य नियोजन करीत काम करणे गरजेचे आहे’, असेही डॉ. गाडगीळ या वेळी म्हणाले.
‘सध्या अणुउर्जा ही सौरउर्जेच्या तुलनेने महाग झाली असून, आर्थिकदृष्ट्यादेखील तो चांगला पर्याय राहिलेला नाही.जैतापूरला मच्छीमारांशी चर्चा करण्यासाठी जाताना आपल्याला संपूर्ण आयुष्यात प्रथमच पोलिसांनी अडविले होते’,अशी आठवणही त्यांनी सांगितली.